ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांचे कार्य राज्याला दिशादर्शक – वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के

**सोनईत कौतुकी नदी सुशोभीकरण व पुनर्जीवन कामाचा शुभारंभ; ५१ मुलींच्या शैक्षणिक दत्तक पालकत्व उपक्रमाची घोषणा**
**नेवासा | प्रतिनिधी:**
“ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विविध संस्थांच्या उभारणीसाठी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांचे नेतृत्व केवळ तालुक्यालाच नव्हे, तर राज्याला दिशादर्शक आहे,” असे प्रतिपादन श्री क्षेत्र ज्ञानेश्वर देवस्थानचे ह.भ.प. वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त सोनई येथे ‘संकल्प दिन’ साजरा करण्यात आला. मंगळवार, १२ मे २०२६ रोजी या औचित्याने कौतुकी नदीच्या सुशोभीकरण व पुनर्जीवन उपक्रमाचा शुभारंभ महाराज म्हस्के आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आला.
कौतुकी नदीचे पुनर्जीवन आणि १० लाखांची देणगी
यावेळी बोलताना शंकरराव गडाख म्हणाले की, २०१२ मध्ये प्रशांत गडाख यांनी नदीचे सुशोभीकरण केले होते. मात्र, वाढते नागरीकरण आणि सांडपाण्यामुळे प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. आता पहिल्या टप्प्यात नदीचे पुनर्जीवन आणि दुसऱ्या टप्प्यात सुशोभीकरण केले जाईल. या कार्यासाठी **यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने १० लाख रुपयांच्या देणगीची** घोषणा त्यांनी केली. तसेच सोनई गावासाठी नवीन **घंटागाडी** उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
५१ गरजू मुलींचे शैक्षणिक पालकत्व
सामाजिक दायित्वाचा वारसा जपत यशवंत प्रतिष्ठानने आजवर ११५ मुलींचे शैक्षणिक दत्तक पालकत्व स्वीकारले आहे. याच उपक्रमाचा विस्तार करत या संकल्प दिनानिमित्त तालुक्यातील आणखी **५१ गरजू मुलींचे शैक्षणिक पालकत्व** स्वीकारण्याची घोषणा शंकरराव गडाख यांनी केली.
विविध सामाजिक उपक्रमांचा जागर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबा अनारसे यांनी केले. गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात दत्तकग्राम, ‘गाव तिथे वाचनालय’, संकल्प साध्या विवाहाचा, मरणोत्तर नेत्रदान आणि वृक्षारोपण यांसारखे उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग, कारभारी जावळे, प्रकाश शेटे, नागेश आघाव, डॉ. रामनाथ बडे, गफूर बागवान यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला विश्वासराव गडाख, सुनीलराव गडाख, अशोकराव गायकवाड, तुकाराम शेंडे, जबाजी फाटके यांच्यासह नेवासा तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, नगरसेवक आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
कौतुकी सुशोभीकरणासाठी नंदकुमार पाटील, ॲड. आण्णासाहेब आंबाडे व इस्माईल शेख यांनीही देणगी जाहीर केली. उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.